राज्याच्या विविध भागात विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Weather Alert Maharashtra)
मान्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान असल्याने राज्याच्या विविध भागात विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Weather Alert Maharashtra) तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कमी झाला असला तरी राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान 12 सप्टेंबरपासून निर्देशानुसार मुंबई, ठाण्यासह कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. घाट भागातही मुसळधार पाऊस पडेल असे सांगण्यात आले.
महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उद्यापासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर ओडिशा, महाराष्ट्र व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 5 दिवसांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
काही दिवसांची उघडीप मिळाल्यानंतर पावसाने पुन्हा थैमान घालायला सुरूवात केली आहे. मागच्या चार दिवसांपासून हवामान खात्याकडून पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. (Maharashtra Weather Update) दरम्यान राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातही पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाकडून राज्यात पावासाचा इशारा देण्यात आला आहे. आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागाने पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय तुंबले
आज संध्याकाळच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या तासाभराच्या पावसात चक्क कल्याण डोंबिवली महापालिकेचे मुख्यालय तुंबल्याचे दिसून आलं. मुख्यालयाच्या आवारात पाणी साचल्याने पालिकेत पार्क केलेली दुचाकी काढताना कर्मचारी तसेच नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली.
कोल्हापुरातही अलर्ट
येत्या 3-4 तासा दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील विवीध ठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असे सांगण्यात आले आहे.