Monsoon 2025 | महाराष्ट्रात काही दिवस ब्रेक घेतलेल्या मान्सूनने आता नव्या जोमात पुनरागमन केलं आहे. विशेषतः मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून, शनिवारी वीज पडल्यामुळे राज्यभरात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. आज (रविवार) अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. मुंबईतही वीजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच घाटमाथ्याच्या परिसरात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रापासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान पोषक बनलं आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाचं अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हवामान खात्याने रविवारी रत्नागिरी आणि सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केला आहे. या दोन जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील इतर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट
रायगड जिल्ह्यात काल सायंकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. आज जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केला असून, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अलिबाग, महाड, पोलादपूर, माणगाव या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, सकाळपासून दाट ढगाळ वातावरण आहे आणि रिमझिम पाऊस सुरू आहे.
वीज पडून नऊ जणांचा मृत्यू
शनिवारी झालेल्या पावसात वीज पडून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सख्ख्या भावांसह चार जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी आहेत. मृतांमध्ये यश राजू काकडे, रोहित राजू काकडे, रंजना बापूराव शिंदे आणि शिवराज सतीश गव्हाणे यांचा समावेश आहे.
परभणी जिल्ह्यातील पिंप्राळा येथे वीज पडून माणिक महादराव मिरासे यांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातील ताजापुरी गावात नथ्थू हरचंद सनेर यांचा मृत्यू झाला, तर जळगाव जिल्ह्यात मोहित जगतसिंग पाटील आणि शांताराम शंकर कठोरे या दोघांचा मृत्यू झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील तुरखेड गावात पवन कोल्हे या युवकाचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.